Will Registration: फक्त १०० रुपयांत करा मृत्यूपत्राची नोंदणी; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Will Registration: आपल्या कष्टाच्या कमाईचे आणि मालमत्तेचे आपल्या पश्चात काय व्हावे, हे ठरवण्यासाठी आता महागड्या वकिली शुल्काची किंवा मुद्रांक शुल्काची गरज उरलेली नाही.

महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्यांसाठी मृत्यूपत्र नोंदणीची प्रक्रिया (Will Registration) सुलभ आणि स्वस्त केली असून, आता केवळ १०० रुपयांत तुम्ही तुमच्या पाल्यांचे भविष्य सुरक्षित करू शकता.

आता महाराष्ट्र सरकारने या प्रक्रियेचा एक भाग अधिक सोपा केला आहे. लोक त्यांच्या मृत्यूपत्राची नोंदणी फक्त १०० रुपयांमध्ये करू शकणार आहेत आणि यासाठी मुद्रांक शुल्क किंवा वकिलाचीही आवश्यकता भासणार नाही.

सध्या राज्यभरात या निर्णयाची चर्चा होऊ लागली आहे कारण यामुळे सामान्य कुटुंबांसाठी मालमत्ता नियोजन सोपे आणि अधिक परवडणारे बनणार आहे.

खरे तर, महाराष्ट्र राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात मृत्यूपत्र नोंदणी करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. लोक आता राज्यातील ५१७ उपनिबंधक कार्यालयांपैकी कोणत्याही ठिकाणी केवळ १०० रुपये शुल्क भरून मृत्यूपत्राची नोंदणी करू शकतात. यासाठी मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही.

नोंदणी दरम्यान, सब-रजिस्ट्रार व्यक्तीच्या ओळखीची पडताळणी करतो आणि मृत्यूपत्रावर स्वेच्छेने स्वाक्षरी केली जात असल्याचे तपासतो.

याचबरोबर सीलबंद मृत्युपत्र जिल्हा निबंधकांकडे जमा करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. यासाठीदेखील १०० रुपये शुल्क आहे. व्यक्तीच्या हयातीत दस्तऐवज गोपनीय राहतो आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते काढले किंवा बदलले जाऊ शकते. सीलबंद मृत्यूपत्र केवळ मृत्यूनंतर आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत उघडले जाते.

मृत्यूपत्र केवळ श्रीमंतांसाठीच नसते

मृत्यूपत्राबाबतची सर्वात मोठे मिथक असे आहे की, मृत्यूपत्राची गरज फक्त मोठ्या मालमत्ता असलेल्या श्रीमंत लोकांनाच असते. पण, हे खरे नसल्याचे अनेक कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

फ्लॅट, जमीन, दागिने, मुदत ठेवी, शेअर्स किंवा म्युच्युअल फंड यांसारख्या संपत्तीचा मालक असलेला कोणताही मृत्यूपत्र तयार करण्याचा विचार करू शकतो. मालकाकडून स्पष्ट-लिखित सूचना नसल्यास लहान बचत देखील कौटुंबिक मतभेदांचे कारण बनू शकते.

मृत्युपत्राशिवाय, कुटुंबातील सदस्यांना वारसाहक्काच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी न्यायालयाकडे जावे लागू शकते आणि अशी प्रकरणे अनेक वर्षे चालू राहू शकतात.

मृत्यूपत्र म्हणजे काय?

मृत्यूपत्र म्हणजेच एक कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती तिच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती, मालमत्ता कशी व कोणाला वाटायची, जबाबदाऱ्या कोणाला सोपवायच्या, हे आधीच ठरवून ठेवते. मृत्यूपत्र भारतीय वारसा कायद्यांतर्गत तयार केले जाते व त्याची अंमलबजावणी केली जाते.

मृत्यूपत्र हा एक असा लेखी दस्तऐवज आहे ज्यामध्ये व्यक्ती आपल्या मालमत्तेचं वाटप करतो, जबाबदाऱ्या ठरवतो, त्याच्या मृत्यूनंतरच्या इच्छा व्यक्त करतो, दानधर्माबद्दलचे निर्णय घेतो. मृत्यूनतर मालमत्तेवरून वारसांमध्ये वाद होऊ नयेत यासाठी त्याची तजवीज केली जाते.

मृत्यूपत्र कोण करू शकतो?

मृत्यूपत्र तयार करण्यासाठी त्या व्यक्तीचे किमान वय २१ वर्षे इतके असणे आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक असावी. म्हणजेच तो काय करतोय, त्याचे परिणाम काय होतील याचे त्याला भान असावे.

तसेच ते स्वेच्छेने केलेले असावे. म्हणजेच ती व्यक्ती कोणाच्याही दबावाखाली अथवा फसवणुकीने मृत्यूपत्र तयार करता येत नाही. कोणी तसा प्रयत्न केल्यास भारतीय वारसा कायद्यांतर्गत ते रद्द देखील होऊ शकते.

Leave a Comment